रत्नागिरी: गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने रत्नदुर्ग किल्ल्यावर प्रथमच वास्तु फलक, माहिती फलक व दिशादर्शक फलक लावण्याचा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
दिनांक २६ जानेवारी २०२५, सकाळी ९ वाजता हा विशेष कार्यक्रम रत्नदुर्ग किल्ल्यावर आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट गडकिल्ल्यांचे वैभव पुनरुज्जीवित करणे व भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी वारसा जपणे असे आहे.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानने या मोहिमेत सहभागी होण्यासाठी जनतेस साद घातली आहे. “आपल्या उपस्थितीने या मोहिमेला बळ मिळेल आणि गडकिल्ल्यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळेल,” असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.