रत्नागिरी: नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय व एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. प्रमुख उपस्थितांमध्ये प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. वर्षा कुबल, प्रा. प्रतीक्षा सुपल यांचा समावेश होता.

विद्यार्थिनी आयेशा सावकार, वैष्णवी बांडागळे, इफ्फत ठाकूर, सानिया खतीब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे विविध पैलू उलगडले. प्रा. मेघना कोल्हटकर यांनी प्रेरणादायी कविता सादर केली, तर प्रा. सचिन टेकाळे यांनी छत्रपतींच्या विज्ञाननिष्ठ विचारसरणीवर प्रकाश टाकत इतिहासातील चुकीच्या संदर्भांबाबत परखड मत मांडले.
महिला सशक्तीकरण आणि शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन या विषयावर प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी मार्मिक मार्गदर्शन केले. चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी छत्रपतींच्या संविधानिक विचारधारेचा आणि सागरी साम्राज्य उभारणीतील ऐतिहासिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.
प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी ‘शिवजयंती फक्त मिरवणुकांची नव्हे, तर विचार अंगीकारण्याची आहे’ असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी अद्वैत शेट्ये याने केले, तर प्रा. वर्षा कुबल यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.