रत्नागिरी : रत्नागिरीतील या जलतरण तलावाला आवश्यक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी दिले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलाव येथे आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या स्पर्धेत जिल्ह्यातून 100 पेक्षा अधिक जलतरणपटू सहभागी झालेले होते. या स्पर्धेचे आयोजन विवेक विलणकर यांनी रत्नागिरी जिल्हा जलतरण असोशिएनशनच्या माध्यमातून केले होते.
या वेळी कार्यकारी अभियंता श्री. ओटवणेकर, बिल्डर नित्यानंद भुते, उद्योजक ओंकार मोरे, जलतरण असोसिएशनचे अध्यक्ष मनोज साळवी, सचिव मनीषा बेडगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी उपस्थित होते. या स्पर्धेत 10 वर्षांखालील गटात मुलांमध्ये कृष्णा पखाले, मुलींमध्ये माही कदम यांनी प्रथम क्रमांक मिळविला. 12 वर्षांखालील गटात कनिष्क घाग, निधी भिडे, 14 वर्षांखालील गटात आयुष काळे, निधी भिडे, 17 वर्षांखालील गटात मुलांमध्ये आयुष काळे व मुलींमध्ये आरोही पालखडे, 19 वर्षांखालील गटात सोहम मंजुळे व मुलीमध्ये तन्मयी जाधव यांनी विजेतेपद पटकाविले. विजयी मुलांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. डेरवण येथील विनायक पवार यांनी मुख्य पंच म्हणून भूमिका बजावली.