गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील धक्कादायक घटना.
रत्नागिरी: खेड-तळे मार्गावर दुचाकीला कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रदीप ढेबे (वय २१) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेहाचा अंत्यसंस्कारासाठी प्रवास करताना रस्त्याच्या अभावामुळे नातेवाईकांना तो झोळीतून ढेबेवाडीपर्यंत न्यावा लागला. या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये पोहोचल्याने महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अजूनही काही भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात रस्त्याच्या अभावामुळे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांच्या वचनांचा फोलपणा उघड झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही आमदारांची दुसरी टर्म सुरू झाली असतानाही मंजूर विकासकामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कागदोपत्री कामे प्रत्यक्षात का होत नाहीत, असा सवाल जनसामान्य विचारत आहेत.
किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी, धनगरवाडी, गायकरवाडी आणि ढेबेवाडीतील ग्रामस्थांनी तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली आहे.