रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला खोटा जन्मदाखला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून मागील १० वर्षांत ग्रामपंचायतींनी दिलेल्या सर्व जन्मदाखल्यांची तपासणी करावी, तसेच दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा रत्नागिरी जिल्हा शाखेने केली आहे.
यासंदर्भात जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने भाजपा नेत्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले. आगामी १२ तारखेला शिर्डी येथे होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण,माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, युवामोर्चा प्रदेश सचिव विक्रांत जैन, जिल्हा उपाध्यक्ष बाबू सुर्वे, व मंडळ खजिनदार शैलेश बेर्डे उपस्थित होते.